Homeब्लॅक अँड व्हाईटखरीप हंगामासाठी राज्यस्तरीय...

खरीप हंगामासाठी राज्यस्तरीय पीक स्पर्धेचे आयोजन

महाराष्ट्राच्या कृषी विभागातर्फे खरीप हंगाम सन २०२४मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल या ११ पिकांसाठी राज्यस्तरीय पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्यात पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करून उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढून आणखी उमेदीने नवनवीन, अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. खरीप हंगाम सन २०२४ पीक स्पर्धेसाठी जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी केले आहे.

पीक स्पर्धेची ठळक वैशिष्टे व बाबी अशा-

पीक स्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख मूग व उडीद पिकासाठी ३१ जुलै तसेच भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग व सुर्यफूल या पिकांसाठी ३१ ऑगस्ट आहे. स्पर्धेसाठी प्रवेशशुल्क प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र सर्वसाधारण गटासाठी रक्कम रु. ३०० व आदिवासी गटासाठी रक्कम रु. १५० राहील. स्पर्धेत भाग घेण्‍यासाठी शेतकऱ्याकडे स्‍वतःच्‍या नावावर जमीन असणे व ती जमीन तो स्वत: कसत असणे आवश्‍यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाचवेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल.

पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याकरीता स्पर्धकास स्वतःच्या शेतावर स्पर्धेकरिता सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या पिकाची भात पिकाच्याबाबतीत किमान २० आर व इतर पिकांच्या बाबतीत किमान ४० आर (१ एकर) क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पीक स्पर्धा तालुकास्तरावर आयोजित करण्यात येणार असून सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरून राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.

अर्ज कोठे करावा व अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे-

१) विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ)

२) ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन

३) ७/१२, ८-अचा उतारा

४) जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास)

५) पीक स्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित ७/१२वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा

६) बँक खाते चेक/पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत

पीक स्पर्धा बक्षिसाचे स्वरूप- सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी पीकनिहाय राज्य पातळी प्रथम क्रमांक ५०००० रुपये, द्वितीय क्रमांक ४०००० रुपये, तृतीय क्रमांक ३००००, जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांक १०००० रुपये, द्वितीय क्रमांक ७००० रुपये, तृतीय क्रमांक ५००० व तालुका पातळीवरील प्रथम क्रमांक ५००० रुपये, द्वितीय क्रमांक ३००० रुपये, तृतीय क्रमांक २००० आहे.

या योजनेबाबत अधिक माहितीसाठी कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य, संकेतस्थळ-www.krishi.maharashtra.gov.in किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

Continue reading

देशातले पहिले अंडरवॉटर म्युझियम सिंधुदुर्गात साकार

सिंधुदुर्गात देशातले पहिले अंडरवॉटर म्युझियम साकार झाले आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी)मार्फत सिंधुदूर्ग जिल्ह्यातल्या निवती रॉक परिसरात भारतीय नौदलाची सेवानिवृत्त युद्धनौका “एक्स-आयएनएस गुलदार” समुद्रतळावर नुकतीच यशस्वीरित्या स्थापित करण्यात आली आहे. देशातल्या अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि वैशिष्ट्यपूर्ण पाणबुडी पर्यटनप्रकल्पाचा हा एक भाग...

४ दिवसांत आज पुन्हा पेट्रोल व डिझेल महागले!

देशात गेल्या चार दिवसांत आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेल महागले. पेट्रोलच्या किंमतीत ८७ पैसे प्रति लीटर तर डिझेसच्या किंमतीत ९१ पैसे प्रति लीटर वाढ करण्यात आली आहे. आज, मंगळवारी मध्यरात्रीपासून ही दरवाढ अंमलात आली आहे. तीन दिवसांपूर्वी १६ मे...

अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांसाठी २० मेपासून प्रवेश

दहावीनंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी व तंत्रज्ञान तसेच वास्तुकला पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७साठी येत्या २० मेपासून प्रवेशप्रक्रिया सुरू होत आहे. ही प्रवेशप्रक्रिया वेळेत राबविण्यासाठी कालबद्ध नियोजन करण्याचे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. विद्यार्थ्यांना...
Skip to content