भारतीय रेल्वेची गौरवयात्रा अंतर्गत आजपासून सुरू होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज सर्किट रेल्वेचा शुभारंभ आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा आणि स्वातंत्र्य इतिहास जिवंत ठेवण्याचे काम या रेल्वेच्या माध्यमातून होणार आहे. आज या रेल्वेतून सातशेपेक्षा जात प्रवासी प्रवास करत आहेत. यातील ८० टक्के प्रवासी हे चाळीस वर्षाच्या आतील आहेत. जे आज छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पाहण्यासाठी जात आहेत. राज्यातील सर्व भागातून आलेल्या सर्व प्रवाशांना या सर्किट रेल्वेच्या माध्यमातून इतिहास अनुभवण्याची संधी मिळणार आहे. शिवराज्याभिषेकास ३५१ वर्ष पूर्ण होत आहेत. आजच्या या दिवशी ही रेल्वे सुरू होत असल्याचा आनंद आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस याप्रसंगी म्हणाले.
या ५ दिवसांच्या विशेष टूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना भेट, इतिहासावर आधारीत कार्यक्रम आयोजित केले आहेत. भारतीय रेल्वे विभाग आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ महाराष्ट्र शासनाशी समन्वय साधून, भारत गौरव ट्रेन ज्या-ज्या ठिकाणी पोहोचेल, त्याठिकाणी असलेल्या पर्यटनस्थळांची सविस्तर माहिती पर्यटकांना देण्यात येणार आहे. 5 दिवसांच्या या प्रवासात रेल्वेस्थानकांपासून ते महाराजांच्या गडकिल्ल्यांपर्यंत, प्रत्येक ठिकाणी इतिहासाच्या पाऊलखुणांचा वेध घेत, पर्यटकांना पर्यटनाचा आनंद घेता येईल.
सहल तपशील –
पाच दिवसांची ही यात्रा पुढील ठिकाणांना भेट देणार आहे.
रायगड किल्ला– छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक येथे झाला व ही राजधानी होती.
लाल महाल, पुणे– छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपण येथे गेले.
कसबा गणपती व शिवसृष्टी, पुणे– पुण्याचे ग्रामदैवत व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील संग्रहालय.
शिवनेरी किल्ला– छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ.
भीमाशंकर ज्योतिर्लिंग– 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रमुख धार्मिक स्थळ.
प्रतापगड किल्ला– अफझल खानावरील ऐतिहासिक विजयाचे ठिकाण.
कोल्हापूर– महालक्ष्मी मंदिर.
पन्हाळा किल्ला– बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्याचे प्रतीक.