Homeन्यूज ॲट अ ग्लांस2 वर्षांची आर्यतारा...

2 वर्षांची आर्यतारा बनली नेपाळची नवी जिवंत कुमारी देवी!

नेपाळमधील दशैन सणाच्या वेळी 2 वर्षे वयाच्या नवीन कुमारीला जिवंत देवीचा मुकूट घालण्यात आला आहे. आर्यतारा शाक्य ही नेपाळची नवीन जिवंत देवी कुमारी म्हणून घोषित करण्यात आली आहे. हिंदू आणि बौद्ध धर्मियांमध्ये ती पूजनीय असते. ती काठमांडूच्या मंदिर राजवाड्यात राहून भक्तांना तारुण्याचा आशीर्वाद देते, अशी भावना आहे. या हिमालयीन राष्ट्रातील हिंदूंमध्ये आदराचे सर्वोच्च स्थान असलेल्या कुमारी देवीचे चरणस्पर्श करण्यासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागतात. कुमारी देवीला फुले वाहून दक्षिणा अर्पण केली जाते. नवीन कुमारी देवी गुरुवारी राष्ट्रपतींसह देशातील तमाम भक्तांना आशीर्वाद देतील.

आर्याताराच्या कुटुंबाने मंगळवारी काठमांडूमधील त्यांच्या घरातून तिला मंदिराच्या महालात नेले. कुटूंब, मित्र आणि भक्तांनी काठमांडूच्या रस्त्यांवरून नवीन कुमारीची मिरवणूक काढली आणि नंतर मंदिराच्या महालात प्रवेश केला, जे अनेक वर्षे तिचे घर राहील. नेपाळमधील सर्वात महत्त्वाच्या दशैन, या हिंदू सणाच्या वेळी नेपाळची नवीन जिवंत देवी म्हणून तिला ओळख देण्यात आली. 2 वर्षे आणि 8 महिन्यांच्या वयात, आर्यतारा शाक्य यांना त्यांच्या पूर्वसुरीनंतर नवीन “कुमारी देवी” म्हणून घोषित करण्यात आले. नेपाळी परंपरेनुसार तारुण्यावस्थेत पोहोचल्यानंतर कुमारी देवींना मर्त्य मानले जाते. कुमारी पारंपारिकपणे काठमांडू खोऱ्यातील नेवार समुदायाच्या शाक्य कुळातून निवडल्या जातात आणि हिंदूबहुल देशात हिंदू आणि बौद्ध दोघेही त्यांचा आदर करतात. 2 ते 4 वयोगटातील निवडलेल्या उमेदवारांची त्वचा, केस, डोळे आणि दात निर्दोष असले पाहिजेत आणि त्यांना अंधाराची भीती वाटायला नको, या प्रमुख अटी असतात. कुमारी नेहमीच लाल रंगाचे कपडे घालते, केसांना गाठींमध्ये बांधते आणि तिच्या कपाळावर “तिसरा डोळा” रंगवलेला असतो.

इंद्रजत्रा उत्सवादरम्यान, भक्तांनी ओढलेल्या रथावर कुमारी देवीला फिरवले जाते. आठवडाभर चालणारा इंद्रजत्रा उत्सव ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या उत्सवांच्या मालिकेतील पहिला उत्सव असतो, ज्यामध्ये मुख्य सण दशैन आणि दिव्यांचा सण तिहार, अर्थात दिवाळी यांचा समावेश असतो. मंगळवारी दशैनचा आठवा दिवस होता. दशैन हा वाईटावर चांगल्याच्या विजयाचा 15 दिवसांचा उत्सव असतो. लोक त्यांच्या कुटुंबियांसोबत हा सण साजरा करतात. या काळात नेपाळमधील सर्व कार्यालये आणि शाळांना सुट्टी असते. नव्या कुमारी देवीचे वडील अनंत शाक्य म्हणाले की, “ती काल माझी मुलगी होती, पण आज ती संपूर्ण राष्ट्राची देवी आहे. तिच्या जन्मापूर्वीच ती देवी होणार असल्याची चिन्हे होती. माझ्या पत्नीला गरोदरपणात स्वप्न पडले होते की, गर्भात एक देवी आकार घेत आहे. आम्हाला माहित होते की, ती खूप खास कोणीतरी होणार आहे.”

2017मध्ये जिवंत कुमारी देवी बनलेल्या, तृष्णा शाक्य या आता 11 वर्षांच्या आहेत. नव्या देवीच्या घोषणेनंतर त्यांच्या कुटुंबियांनी आणि समर्थकांनी मंदिरातील मागच्या प्रवेशद्वारातून त्यांना पालखीतून मिरवणुकीने बाहेर नेले. शाक्य कुळातील अनेक कुटूंब या प्रतिष्ठित स्थानासाठी आपल्या मुली पात्र ठराव्यात म्हणून जोरदार स्पर्धा करतात. कुमारी देवी कुटुंबाला समाजात आणि त्यांच्या स्वतःच्या कुळात उच्च स्थान मिळते. माजी कुमारी देवी मात्र नंतर एकटे जीवन जगतात. त्यांना वर्षातून फक्त काही वेळाच सणांसाठी बाहेर पडण्याची परवानगी असते. माजी कुमारींना सामान्य जीवनाशी जुळवून घेण्यास, घरकाम करायला शिकण्यास आणि नियमित शाळेत जाण्यास अडचणी येतात. नेपाळी लोककथा अशी आहे की, जे पुरुष माजी कुमारीशी लग्न करतात, ते तरुणपणीच मरतात. त्यामुळे अनेक जिवंत कुमारी देवी  मुली अविवाहित राहिल्या आहेत. गेल्या काही वर्षांत, या परंपरेत बरेच बदल झाले आहेत आणि कुमारींना आता मंदिराच्या महालात खाजगी शिक्षकांकडून शिक्षण घेण्याची आणि टेलिव्हिजन ठेवण्याची परवानगी आहे. नेपाळ सरकार निवृत्त कुमारींना सुमारे 110 अमेरिकी डॉलर्स म्हणजे 15,650 नेपाळी रुपये (9,750 भारतीय रुपये) इतके तुटपुंजे मासिक पेन्शनदेखील देते. अर्थात ते नेपाळमध्ये सरकारने निश्चित केलेल्या किमान वेतनापेक्षा थोडे जास्तच आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content