काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्तीच्या नेमणूकासंदर्भात केंद्र सरकारच्या आस्तेकदम धोरणाविरुद्ध आपला असंतोष व्यक्त केला होता. ‘सरकार न्यायव्यवस्थेला हुशार न्यायाधीश न देता सुचवलेल्या नावांवर बसून राहते’, अशाने न्यायालयाच्या कामांवर परिणाम होत असल्याबाबत खंतही व्यक्त केली होती. सर्वोच्च न्यायालयाचा अनादर करण्याचा हेतू नाही. फक्त या एका वाक्यासंदर्भात मात्र बोलणार आहोत. केवळ न्यायाधीश बुद्धिमान वा हुशार असून भागत नाही तर त्याबरोबर काम करणाऱ्या यंत्रणाही तितक्याच कुशल असाव्या लागतात. दोहोंमध्ये काहीच समन्वय नसल्याने देशाच्या विविध न्यायालयांत लाखो खटले पडून आहेत. अनेक खटल्यांची उदाहरणे देता येतील. शिवाय दररोजची वर्तमानपत्रे नुसती चाळली तरी हेच दिसून येईल. 20 वर्षांनी सुनावणी सुरू, संशयित आरोपीला सहा महिन्यांनी सोडले… आदी अनेक उदाहरणे आहेत. असेच एक प्रकरण आहे- मिरा-भाईंदरमधील बोगस कॉलसेंटर शेकडो कोटींच्या गफला प्रकरणातील प्रमुख आरोपी व अन्य काहीजण पोलिसांच्या ताब्यात आहेत तर काहींना जामीनही मिळालेला आहे. मात्र 2016मध्ये खटला सुरू होऊनही अद्यापी या खटल्याची केवळ एकच सुनावणी झालेली आहे. या प्रकरणातील अनेक आरोपी फरार तसेच काहीजण परदेशात असल्याने चौकशीस विलंब होत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येते. त्यात तथ्यही आहे. नाही असे नाही. परंतु विलंबालाही काही मर्यादा असावी.
या प्रकारणात दर दीड-दोन वर्षांनी चौकशी अधिकारी बदलला जातो. नाहीतर त्याची बदलीतरी होते. या संपूर्ण प्रकरणात देशातील विविध शहरे तसेच परदेशातही संपर्क साधावा लागतो. म्हणूनच या बोगस कॉलसेंटर प्रकरणाचा व्याप व पसारा पाहता हे संपूर्ण प्रकरण राज्य सीआयडी (राज्य गुप्तचर विभागाकडे) सुपूर्द केले जावे, असे आम्हाला वाटते. ठाणे पोलिसांच्या गुन्हा प्रकाटीकरण शाखेने या संबंधात कोठे कसूर केलेली नाही. परंतु सीआयडीकडे गेल्याने प्रकरणाला गती मिळेल, असे वाटते.
![](https://kiranhegdelive.com/wp-content/uploads/2023/10/IMG-20230928-WA0005-1024x372.jpg)
या प्रकरणातील अनेक आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी न्यायालयाला सादर करण्यात आलेली आहे. या खटल्याची पहिली सुनावणी 2-12-2016 रोजी झाली होती आणि आता तब्बल सात वर्षांनी 7-10-2023 रोजी ठाणे कोर्टात होणार आहे. दरम्यान दानिश पटेल (आरोपी क्र. 45) याला जामीन मिळालेला असून न्यायालयाने घातलेल्या अटीनुसार तो पोलिसांसमोर फारच कमी वेळा हजर राहिलेला आहे. गेले अनेक महिने त्याने पोलिसांना तोंड दाखवलेले नाही. मिरा-भाईंदरमधील सुत्रानुसार तो देश सोडून पळून गेल्याचे समजते. सध्या तो दुबईला असल्याचे समजते. दरम्यान, त्याच्या वडिलांनी त्याचे मिरा-भाईंदरमधील घर विकून टाकले आहे, कारण पोलीस कारवाई झाल्यास त्याच्या नावारील घरावर कारवाई होईल, असे गृहीत धरून वडिलांनी घर विकले. आणि आता ते स्वतः नातेवाईकांच्या आश्रयास गेले आहेत.
दानिश फरार झाल्यानंतर पोलिसांनी काहीच हालचाल केली नसल्याचे समजते. या प्रकरणी पंकज ठक्कर हा प्रमुख आरोपी असून त्याने अनेकांना हाताशी धरून त्या परिसरात आलिशान कार्यालय विकत घेतले होते. तो आणि त्याचे सहकारी आलिशान गाड्या फिरवून ग्राहकांना भुरळ पाडत होते. या प्रकरणाची पोलीस नोटीसही अद्याप काढली गेली नाही, असे समजते.