पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यासाठी बसावे. निदान पोपटाच्या नादाने तरी काहीजण तुमच्यावर विश्वास ठेवतील. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात भाष्य करण्याच्या भानगडीत पडू नये. भाष्य करण्याआधी त्यांनी आपली सार्वजनिक जीवनातील पत किती आहे हे तपासून पाहवे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी आज मुंबईत एका पत्रकार परिषदेत केली.
अजित पवार नॉटरिचेबल असले की ते नाराज आहेत अशाच बातम्या माध्यमांमध्ये दाखवल्या जातात. पण ते नॉटरिचेबलही नाही आणि नाराजही नाहीत. अजित पवार यांना निवडणुकीच्या कार्यकाळात घशाचे इन्फेक्शन झाले असल्याने डॉक्टरांनी काळजी घ्यायला सांगितले आहे. मात्र ते उद्यापासून प्रचारात सहभागी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

काँग्रेसने आरोप जे केले ते योग्य नाहीत. अजितदादा यांचासारखा मासलिडर ज्यांचे महाराष्ट्रातील प्रत्येक गावामध्ये, वॉर्डात, तालुका, जिल्हयात कार्यकर्ते आहेत. मतदारांचा मोठा वर्ग आहे. पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या नेत्याला प्रचारापासून बाजूला ठेवून कोण स्वतःचे नुकसान करुन घेईल, असा सवाल त्यांनी केला.
राज्यात महायुतीला १५-१६ जागा मिळतील तर मविआला ३०-३५ जागा मिळतील अशी भविष्यवाणी पृथ्वीराज चव्हाण यांनी वर्तवली आहे. तशीच भविष्यवाणी शरद पवार आणि रोहित पवार यांनीही केली आहे. राज्यात निवडणुकीचे सर्व टप्पे पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळे अशी भविष्यवाणी करुन पुढच्या मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पवारसाहेबांकडे दीर्घ अनुभव आहे त्यामुळे त्यांच्याबाबत बोलणार नाही. परंतु पृथ्वीराज चव्हाण हे फक्त राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत म्हणून टिव्हीवर काही प्रमाणात त्यांना टीआरपी मिळतो. पण त्यांना राज्यासंदर्भात बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. राजकारणावर भाष्य करावे एव्हढी उंचीही त्यांची नाही. ज्या विधानसभेत ते नेतृत्त्व करतात त्यांना त्यांच्याकडे स्वतःची ग्रामपंचायतदेखील नाही, अशा शब्दांत उमेश पाटील यांनी त्यांच्यावर तोफ डागली.
अजितदादा पवार यांच्या पक्षाला एकही जागा मिळणार नाही हे मतदार ठरवतील. ४ जूनला त्याचे निष्कर्षही येतील. अजित पवार यांच्या पाठीशी ४०-५० आमदार आहेत. पण पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत किती आमदार आहेत? काँग्रेसचा एकही आमदार त्यांच्या पाठीशी नाही. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांचे भाष्य माध्यमांनी किती गांभीर्याने घ्यावे याचादेखील विचार करावा असेही ते म्हणाले.

अहो आता माझी गाडी तपासली तरी माझ्या गाडीत ३-४ बॅगा सापडतील. माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता राज्यात प्रचारासाठी फिरत असताना एवढे साहित्य ठेवतो. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री दौरा करणार त्यावेळी त्यांचे सामान सोबत असणारच आहे. शिवाय कर्मचारीही सोबत असतात. त्यांचेही सामान असणार आहे. त्यात एवढे गहजब करण्याची काय आवश्यकता असा थेट सवाल उमेश पाटील यांनी केला.
लोकसभा निवडणुकीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दौरे देशभर सुरु आहेत. त्यांच्या दौऱ्याचे नियोजन काटेकोरपणे केलेले असते. त्यामुळे सुरक्षेच्यादृष्टीने घाटकोपर दुर्घटनेच्या ठिकाणी अशी परवानगी दिली गेली नाही. यापूर्वी या देशाचे दोन पंतप्रधान सुरक्षेच्या कारणास्तव गमावलेले आहेत. म्हणून सुरक्षा यंत्रणा काळजी घेत असते आणि त्यामुळेच प्रचाराचा कार्यक्रम सोडून तिथे भेट देणे शक्य झाले नाही, असे सांगतानाच बेकायदेशीर होर्डिंगसंदर्भात कायदा बनवावा अशी मागणी राष्ट्रवादी विधिमंडळाच्या येणाऱ्या अधिवेशनात करेल असेही ते म्हणाले.