Saturday, July 27, 2024
Homeटॉप स्टोरीराज्यात ‘लेक लाडकी’...

राज्यात ‘लेक लाडकी’ होणार ‘लखपती’!

राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवून गरीब कुटुंबातील मुलींना ‘लखपती’ करण्याचा निर्णय काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यावर ६ हजार रुपये, सहावीत गेल्यावर ७ हजार रुपये, ११वीत गेल्यावर ८ हजार रुपये, १८ वर्षे पूर्ण झाल्यावर ७५ हजार रुपये, अशा रितीने एकूण त्या मुलीस १ लाख १ हजार रुपये एवढा लाभ मिळेल. या संदर्भात अर्थसंकल्पीय भाषणात उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती. माझी कन्या भाग्यश्री, ही योजना अधिक्रमित करून १ एप्रिल २०२३पासून जन्मणाऱ्या मुलींसाठी ही योजना राबविण्यात येईल.

मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन त्यांचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे यासाठी ही योजना राबविण्यात येईल. १ एप्रिल २०२३नंतर कुटुंबात जन्मणाऱ्या १ अथवा २ मुलींना त्याचप्रमाणे १ मुलगा व १ मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळेल. दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास १ मुलगा किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल. मात्र आई किंवा वडिलांनी कुटूंबनियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील. १ एप्रिल २०२३पूर्वी १ मुलगी किंवा मुलगा आणि आणि त्यानंतर दुसरी मुलगी किंवा जुळ्या मुली जन्माला आल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळेल. जुळ्या दोन्ही मुलांना स्वतंत्र लाभ देण्यात येईल. मात्र, लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

जलविद्युत क्षेत्रात लवकरच मोठी खासगी गुंतवणूक

सार्वजनिक खासगी भागीदारीतून उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी (Pumped Storage Projects) स्वतंत्र धोरण राबवून मोठ्या प्रमाणावर खासगी गुंतवणुकीला जलविद्युत क्षेत्रामध्ये प्रोत्साहन देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

राज्यात १० हजार ७५७ मेगावॅट अपारंपरिक ऊर्जा उत्पादन झाले आहे. २०२५पर्यंत ही ऊर्जाक्षमता  २५ हजार मेगावॅटपर्यंत गाठण्याचे उद्दीष्ट आहे. सौर तसेच वाऱ्याच्या वेगाद्धारे निर्माण होणारी ऊर्जा पुरेशी नाही. त्यामुळे अशाश्वत नवीकरणीय ऊर्जा क्षमतेमध्ये तफावत येऊन एकूणच ग्रीडला आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे एनर्जी स्टोरेज सिस्टिमला महत्त्व आहे. यामध्ये अन्य पारंपरिक ऊर्जा प्रकल्पांना एनर्जी स्टोरेज सिस्टिममधून ऊर्जा देऊन ग्रीडचे संतुलन ठेवता येऊ शकते. वीज निर्मितीत खंड पडल्यास अथवा तुडवडा पडल्यास या सिस्टिममधून ऊर्जा उपलब्ध होऊ शकते. केंद्रीय विद्युत मंत्रालयानेदेखील देशात उदचंन जलविद्युत प्रकल्पांना उत्तेजन देण्याचे ठरविले आहे.

या धोरणाद्धारे उदचंन जलविद्युत प्रकल्पातून (पीएसपी) मेगावॅट लेव्हल एनर्जी स्टोरेज क्षमता विकसित करणे सद्य:स्थितीतील पंप हायड्रो सोलर हायब्रील पॉवर प्रकल्पांना प्रोत्साहन देणे, आंतरखोरे हस्तांतरणासाठी प्रोत्साहन देणे तसेच खासगी क्षेत्रातील गुंतवणूक आकर्षित करण्यात येईल. या संदर्भातील विकासकाची निवड सामजंस्य कराराद्धारे सरळ वाटप किंवा स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेतून करण्यात येईल. उदचंन प्रकल्पाच्या माध्यमातून एनर्जी स्टोरेज सिस्टिमद्वारे क्षमता वाढविता येऊ शकते. शिवाय ते पर्यावरणस्नेही आणि स्वस्त आहे. सध्या घाटघर येथे उदचंन प्रकल्प २००८पासून कार्यान्वित आहे.

सांगली, अहमदनगर जिल्ह्यांत जिल्हा व अति. सत्र न्यायालये

सांगली, अहमदनगर जिल्ह्यात  जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालये सुरू करण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. सांगली जिल्ह्यातील विटा येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करून १९ नियमित पदे व ५ मनुष्यबळाच्या सेवा बाह्य यंत्रणेद्धारे घेण्यास मान्यता देण्यात आली यासाठी एकूण १ कोटी ५० लाख ६८ हजार २५६ इतका खर्च येईल. या नव्या न्यायालयात पलूस, विटा, कडेगाव, आटपाडी या तालुक्यातील १ हजार ९१३ प्रकरणे वर्ग होतील. सध्या विटा येथे २ दिवाणी न्यायालये (वरिष्ठ स्तर) व ३ दिवाणी न्यायालये (कनिष्ठ स्तर) कार्यरत आहेत.

लेक लाडकी

अहमदनगर जिल्ह्यात राहाता येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय सुरु करण्यात येईल. १९ नियमित पदे व ६ मनुष्यबळाच्या सेवा बाह्य यंत्रणेद्धारे घेण्यास मान्यता देण्यात आली यासाठी एकूण २ कोटी १३ लाख ७६ हजार ४२४ इतका खर्च येईल. कोपरगाव न्यायालयाकडून या न्यायालयात एकूण १३३६ प्रकरणे वर्ग होणार आहेत.  राहाता न्यायालयाच्या क्षेत्रात प्रलंबित खटल्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

फलटण-पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग करणार रेल्वे

फलटण ते पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग आता महारेल ऐवजी रेल्वे मंत्रालयातर्फे पूर्ण करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. फलटण ते पंढरपूर हा रेल्वेमार्ग तयार करण्यासाठी महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनीने (महारेल) १८४२ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाचा अहवाल तयार केला होता. यामध्ये राज्य शासनाचा सहभाग ९२१ कोटी इतका असून हा निधी टप्प्याटप्याने उपलब्ध करून देण्यात येत आहे. हा प्रकल्प महारेलऐवजी रेल्वे विभागातर्फे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भोसला मिलिटरी स्कूलला नागपूरमध्ये जमीन

नाशिक येथेील भोसला मिलिटरी स्कूलला नागपूर येथे जमीन देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. नागपूर येथे मौजा चक्कीखापा येथील स.क्र. ६४/१, आराजी २१.१९ हे.आर. ही जमीन ३० वर्षांच्या भाडेपट्टयाने देण्यात येईल. भोसला मिलिटरी स्कूल हे नाशिक येथील सेंट्रल हिंदू एज्युकेशन सोसायटीमार्फत चालविण्यात येत असून अतिविशिष्ट गुणवत्ताधारक आणि ख्यातनाम संस्था म्हणून या संस्थेस जागा देण्याचा निर्णय झाला आहे. या ठिकाणी भारतीय प्रशासनीक पूर्व सेवा तयारी प्रशिक्षण वर्ग निवासी सुविधा व वरिष्ठ महाविद्यालयासह सुरू करण्यात येईल.

आता औरंगाबाद विद्यापीठही होणार छ. संभाजीनगर विद्यापीठ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नावात औरंगाबादऐवजी छत्रपती संभाजीनगर असा बदल करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे या विद्यापीठाचे नाव आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर असे होईल. या विद्यापीठासमोर नमूद जिल्ह्यांच्या सूचित देखिल औरंगाबादऐवजी छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादऐवजी धाराशिव असा बदल करण्यात येईल. नवीन अभ्यास पाठ्यक्रम, विषय, नवीन महाविद्यालये, अतिरिक्त तुकड्या सुरु करण्यासाठी आता पूर्वीच्या तारखेत बदल करण्यात येऊन १५ नोव्हेंबर २०२३ पूर्वी विद्यापीठाच्या कुलसचिवांकडे विहित नमुन्यात अर्ज करण्यास मान्यता देण्यात आली.

Continue reading

आता आयकर भरा व्‍हॉट्सअॅपच्‍या माध्‍यमातून!

क्‍लीअरटॅक्‍स या भारतातील आघाडीच्‍या ऑनलाईन टॅक्‍स-फाइलिंग प्‍लॅटफॉर्मने त्‍यांच्‍या उल्‍लेखनीय व्‍हॉट्सअॅप आधारित इन्‍कम टॅक्‍स रिटर्न (आयटीआर) फाइलिंग सोल्‍यूशनच्‍या लाँचची नुकतीच घोषणा केली. या उल्‍लेखनीय सेवेचा भारतातील २ कोटींहून अधिक कमी-उत्‍पन्‍न ब्‍ल्‍यू-कॉलर व्‍यक्‍तींसाठी आयकर भरण्‍याची सुविधा सोपी करण्‍याचा मानस आहे, जे...

पेटीएमने संपादित केला १५०२ कोटींचा कार्यसंचालन महसूल

पेटीएमने आर्थिक वर्ष २०२४-२०२५च्‍या पहिल्‍या तिमाहीच्या आर्थिक निकालांची घोषणा केली आहे, ज्‍यामधून कंपनीच्या विविध घटकांमधील सुधारणा निदर्शनास येते. कंपनीने १,५०२ कोटी रूपयांच्‍या कार्यसंचालन महसूलासह ७९२ कोटी रूपयांच्‍या ईबीआयटीडीए तोट्याची नोंद केली आहे. कंपनीसाठी अलीकडच्या व्‍यत्‍ययांचा संपूर्ण आर्थिक परिणाम आर्थिक...

साहिल नायरनी लाँच करताहेत ‘मिला ब्‍युटी’..

भारतातील सर्वात लोकप्रिय ब्‍युटी ब्रँड्सचे धोरणात्‍मक समर्थक साहिल नायर त्‍यांचा नवीन उद्यम 'मिला ब्‍युटी' (पूर्वीचा मिलाप कॉस्‍मेटिक्‍स) लाँच करण्‍यासाठी सज्‍ज आहेत. व्‍यवस्‍थापकीय संचालक व सहसंस्‍थापक म्‍हणून साहिल भारतातील ग्राहकांच्‍या विविध गरजांची पूर्तता करण्‍यासाठी डिझाईन करण्‍यात आलेल्‍या सर्वोत्तम दर्जाच्‍या, नाविन्‍यपूर्ण...
error: Content is protected !!