Homeपब्लिक फिगरजरांगेंनी उपोषण सोडल्यामुळे...

जरांगेंनी उपोषण सोडल्यामुळे अनेकांचे उधळले गेले मनसुबे!

काल मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले म्हणून अनेक लोकांचे मनसुबे उधळून गेले. मराठा समाजाने 2014 ते 2019मध्ये लाखोंच्या संख्येने शांतपणे संयमाने महाराष्ट्रात मोर्चे काढले. कधीच हिंसाचार केला नाही. परंतु यावेळेस काही लोकांनी समाजकंटकांना घेऊन हिंसाचार घडवून सरकारला आणि मनोज जरांगे पाटील यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज एका पत्रकार परिषदेत केला.

मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीसुद्धा आवाहन केले होते की, शांत राहा, जाळपोळ आणि तोडफोड करू नका. तरीसुद्धा काही ठिकाणी अनुचित प्रकार घडले. काही लोक नेहमी बोलत होते आम्ही मराठा समाजासोबत आहोत, त्यांना न्याय मिळाला पाहिजे, आरक्षण मिळाले पाहिजे. तेच लोक काल सहकुटूंब फिरायला गेले. मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू होते. महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलन आणि उपोषण सुरू होते. तरीही हेच लोक सहपरिवार आम्ही ज्या विमानतळावर उतरलो, त्याच विमानतळावरून फिरायला गेले, असा टोलाही सामंत यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

जरांगे

मी कालच्या शिष्टमंडळात होतो आणि मनोज जरांगे पाटील यांच्याशी आम्ही सखोल चर्चा केली. त्यांना आम्ही विश्वास दिला की आमचे सरकार मराठा समाजाला कायमस्वरुपी टिकणारे आरक्षण देणार आहोत. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. पुन्हा मुंबईत आंदोलन करण्याची गरज भासणार नाही, असा आम्ही त्यांना ठाम विश्वास दिला. मनोज जरांगे पाटील यांनी आम्हाला दोन महिन्यांचा कालावधी दिलेला आहे. या दोन महिन्यांत सरकार अधिक मनुष्यबळ वापरून अधिक वेगाने काम करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, त्यासाठी सरकारने याआधीच काम सुरू केलेले आहे आणि कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केलेली आहे. शिंदे समिती या विषयावर गंभीरपणे जोमाने आणि चांगले काम करत आहे. त्यांना मोठ्या प्रमाणात कुणबी नोंदी सापडल्या आहेत. आणखी मोठ्या प्रमाणात कुणबी नोंदी सापडतील. त्यासाठी काम सुरू केलेले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. महाराष्ट्रात मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री होऊन गेले. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतात आणि त्यासाठी ते प्रामाणिकपणे सकारात्मक काम करत आहेत, असेही उद्योगमंत्री सामंत यांनी सांगितले.

मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे की मराठा समाजातील तरुणांवरील आंदोलनाच्या केसेस मागे घाव्यात. तर त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचना दिलेल्या आहेत. पहिल्या आंदोलनातल्या केसेस येत्या १५ दिवसात मागे घेतल्या जातील आणि बाकीच्या महिन्याभरात सर्व केसेस मागे घेतले जातील. मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे की शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे त्यांना भरपाई द्यावी तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४४१ शेतकऱ्यांना संपूर्ण भरपाई देण्यात येणार, असे सांगितले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या सरकारने लेखी स्वरूपात नोंदी करून तसे काम सुरू केलेले आहे, असेही ते म्हणाले.

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content