पुणे, बारामती, मावळ आणि शिरुर येथील महायुतीच्या चारही उमेदवारांना आपल्याला विजयी करायचे आहे. पुणेकर खूप हुशार आहेत. एखाद्याच्या घरासमोरची गाडी काढायची असेल तर ते त्या गाडीची हवा काढतात. या निवडणुकीतदेखील विरोधी उमेदवाराला पराभूत करण्यासाठी पुणेकर त्यांची हवा काढतील, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल लगावला.
लोकसभा निवडणुकीची ही लढाई महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी नसून जगभरात भारताचा सन्मान वाढवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध देशाची बदनामी करत फिरणारे राहुल गांधी यांच्यातच आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. पुणेकर खूप हुशार आहेत. येत्या निवडणुकीत ते विरोधकांची हवा काढतील अशी टीका त्यांनी केली.
![](https://kiranhegdelive.com/wp-content/uploads/2024/04/IMG-20240430-WA0001-1024x683.jpg)
पुण्यातील रेसकोर्स मैदानात आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या प्रचारसभेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, विश्वासाचे दुसरे नाव म्हणजे मोदी आणि विकासाचे दुसरे नाव म्हणजे मोदीच आहे. लोकांचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत आहे, म्हणून महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या रेकॉर्डब्रेक सभा होत आहेत. मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी या देशाची १४० कोटी जनता आतूर आहे. हीच गॅरंटी समोर बसलेल्या अथांग जनसागराने दिली आहे.
‘प्राण जाए पर वचन ना जाए’ ही मोदींच्या कामाची पद्धत आहे. ते म्हणाले होते कलम ३७० हटवणार आणि त्यांनी कलम ३७० हटवले व आपल्या काश्मिरला भारताशी जोडले. राम मंदिर आपल्या सगळ्यांना स्वप्नवत वाटत होते. परंतु मोदींनी अयोध्येमध्ये भव्य राम मंदिरांची उभारणी केली आणि करोडो रामभक्तांचे स्वप्न पूर्ण झाले, असे मुख्यमंत्री म्हणाले.
![](https://kiranhegdelive.com/wp-content/uploads/2024/04/IMG-20240430-WA0007-1024x683.jpg)
मोदींच्या नसानसांत, रक्ताच्या प्रत्येक थेंबात देशभक्ती भरलेली आहे. जेव्हा मोदी द्वारका दर्शनासाठी पाण्याखाली गेले तेव्हाही त्यांनी भगवान श्रीकृष्णाकडे देशहिताची प्रार्थना केली. हाच मुख्य फरक देश बुडवणारे विरोधक आणि देशहिताची प्रार्थना करणारे मोदी यांच्यात आहे. भारताला महासत्ता करण्याचे वचनदेखील मोदी पूर्ण करून दाखवतील, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.