Homeडेली पल्सदिव्यांगांच्या आशियाई क्रीडा...

दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने रचला इतिहास!

दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय दिव्यांग क्रीडापटूंनी 29 सुवर्ण पदकांसह एकूण 111 पदके पटकावत, भारताच्या आतापर्यंतच्या सर्वोच्च पदक तालिकेसह इतिहास रचला आहे.

भारताने यापूर्वी 2010 सालच्या स्पर्धेत 14 पदके जिंकली होती. तर 2014मध्ये 33 आणि 2018मध्ये 72 पदके जिंकली होती. आताच्या क्रीडा स्पर्धेच्या सुरुवातीपासून भारताने सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली असून भारत स्पर्धेच्या पदकतालिकेत 5 व्या क्रमांकावर होता. भारताने या वर्षी आपला 303 खेळाडूंचा सर्वात मोठा चमू पाठवला होता, ज्यात 191 पुरुष आणि 112 महिला क्रीडापटूंचा समावेश होता. भारताने मिळवलेल्या एकूण 111 पदकांपैकी 40 म्हणजे पदकसंख्येच्या 36% पदके महिला खेळाडूंनी कमावली आहेत.

या विक्रमी कामगिरीबद्दल बोलताना केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर म्हणाले की, ही चमकदार कामगिरी आमच्या खेळाडूंच्या कठोर परिश्रमाचे आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली क्रीडा क्षेत्रातील योग्य धोरणांचे फलित आहे. तळागाळातील खेळाडूंसाठीची खेलो इंडिया योजना असो किंवा सर्वोत्तम खेळाडूंसाठी लक्ष्य ऑलिम्पिक पोडियम योजना असो, या योजनांच्या माध्यमातून दिले जाणारे पाठबळ आता चांगले परिणाम दाखवत आहे, असे ते म्हणाले.

या स्पर्धेत 8 ‘खेलो इंडिया’ क्रीडापटू आणि 46 ‘टॉप्स’ क्रीडापटू सहभागी झाले आणि 111 पैकी एकूण 38 पदके या क्रीडापटूंनी मिळवली आहेत, हे जाणून तुम्हाला आनंद होईल, असे अनुराग सिंग ठाकूर म्हणाले. 2014 सालच्या तुलनेत क्रीडा अर्थसंकल्पात 3 पट वाढ झाल्याने आम्हाला आमच्या सर्व खेळाडूंना, मग ते प्रशिक्षक असो वा प्रशिक्षण, परदेशी प्रदर्शन, आहार, पायाभूत सुविधा या बाबतीतही चांगले पाठबळ देण्याची क्षमता निर्माण झाली आहे, असे त्यांनी सांगितले.

क्रीडा क्षेत्रातील भारताची ताकद वाढत आहे, हे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा तसेच दिव्यांगांसाठीच्या या आशियाई क्रीडा स्पर्धा आणि यापूर्वी झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धा, दिव्यांगांसाठीच्या स्पर्धा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, डेफलिंपिक या स्पर्धांमधील खेळाडूंच्या नेत्रदीपक कामगिरीवरून दिसून येते, असेही त्यांनी सांगितले. माननीय पंतप्रधानांनी अलीकडेच आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या बैठकीत सांगितल्याप्रमाणे भारत केवळ चांगली कामगिरी करत नाही तर 2030 मधील युवा ऑलिम्पिक असो किंवा 2036 मधील उन्हाळी ऑलिंपिक असो, या सारख्या मोठ्या स्पर्धांचे आयोजन करण्यासही तयार आहे, असे ते म्हणाले.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content