पश्चिमी देशांमध्ये पिढ्यांची गणना भारतापेक्षा थोडी वेगळ्या पद्धतीने केली जाते. त्यात १९६० ते १९८०च्या दरम्यान जन्मलेल्या व्यक्ती या ‘क्ष’ पिढीच्या आहेत असे मानले जाते. यानंतर १९८० ते १९९६दरम्यान जन्मलेल्या व्यक्ती या ‘य’ पिढीच्या आहेत असे मानले जाते. तर अगदी अलीकडची म्हणजे १९९५पासून २०१५पर्यंत जन्मलेल्या व्यक्ती या ‘ज्ञ’ पिढीच्या आहेत असे मानले जाते. आपल्याकडे हीच नावे वरिष्ठ नागरिक, नोकरीसक्षम नागरिक आणि तरुण या रीतीने समजावून घ्यायची आहेत. कारण विषय जागतिक महत्त्वाचा आहे आणि त्यात एक सर्वेक्षण दिवसभरात आपण काळजीत किती वेळ घालवतो यासंबंधीचे होते. आजच्या तरुणाईचे सगळे काही आलबेल आहे असे मानले जात असताना त्यात धक्का देणारा एक निष्कर्ष निघाला की, आजच्या ‘ज्ञ’ पिढीतील १०पैकी किमान एकतरी तरुण काळजीने ग्रस्त आहे.
वेगळे काही सांगायची गरजच उरलेली नाही इतक्या स्पष्ट रीतीने दिसते आहे की, ‘काळजी अथवा चिंता’ हा विषय आपल्या जीवनात नकोसा मानला तरी वारंवार येत राहणारा पाहुणा आहे आणि त्याला आपण येऊ नको म्हटल्याने तो बाहेरच राहिल अशी खात्री देता येत नाही. ६२ टक्के तरुणाईच्या बाबतीत (‘ज्ञ’ पिढी) तसेच काही प्रमाणात मध्यमवयीन लोकांच्या बाबतीत असे दिसले की, त्यांची काळजी कधी कमी होतच नाही. ही मंडळी सरासरी दररोज २ तास १८ मिनिटे केवळ काळजीच्या कैदेत असतात. हा वेळ इतर उत्पादक अथवा निर्मितीक्षम काम करण्यात किंवा इतर काही नसेल तर आपली वैयक्तिक क्षमता कशी वाढेल यासाठीदेखील खर्च केला जाऊ शकला असता.

ही काळजी नेमकी केव्हा जाणवते आणि त्रास देते हे सांगताना ३३ टक्के तरुणाईचे म्हणणे असे होते की, ते एकटे असताना ही काळजी सर्वात अधिक जाणवते. ३० टक्के तरुणाई रात्री झोपायला जाण्याअगोदर त्यांची काळजी वाढते. ही काळजी उद्याचा दिवस काही चांगले घेऊन येणार की नाही यासंबंधी असू शकते. या काळजीमुळे शांत झोप मिळत नाही असेही सांगितले गेले. १७ टक्के तरुणांच्या मनात सकाळी जागे झाल्याबरोबर काळजीचे ढग आलेले असतात. इतरांच्याही कहाण्या अशाच पण लक्षात घेण्यासारख्या होत्या. आर्थिक तरतूद कशी करायची हा प्रश्न सर्वात अधिक काळजीच असतो. आणि ५० टक्के तरुणाईने पैसे हीच काळजीची बाब असते असे सांगितले. ४२ टक्के तरुणाईला घरातील आणि कुटुंबातील घटनांची आणि आजारपणाची काळजी पोखरते. इतरांना मागे राहिलेले काम कसे पूर्ण करता येईल याची काळजी वाटणे साहजिकच असते, कारण त्यावरच त्यांचे लक्ष असते.
स्वत:च्या आरोग्याची काळजी केवळ ३७ टक्के तरुणाई करताना दिसली. बेकार असण्याच्या काळात लोकांच्या बोलण्यामुळे झोप न येणे ही आणखी काही कारणे होती. तरुणाई राजकीय अस्थिरतेबद्दल फारच कमी प्रमाणात काळजी करीत होती असे दिसले. त्याचे कारण समजण्यासारखे आहे. आमचे असे हाल आहेत तर आमच्या मुलांचे कसे होणार? अशी रास्त भीतीवजा काळजी ७७ टक्के तरुणाईने बोलून दाखवली. परंतु त्यावर स्पष्ट उत्तर मात्र कुणीही दिले नाही किंवा आधीच्या पिढ्यांवर त्याचा दोषही लावला नाही. हा एक समजूतदारपणा जाणून आणि समजून घेण्यासारखा आहे. तरुणाईच्या एका पालकाचे शब्द याबाबतीत फार बोलके आहेत. ते म्हणतात, “प्रामाणिकपणे सांगायचे तर माझ्या मुलांची योग्य ती वाढ होईल किंवा त्याला संधी मिळेल असे हे जगच राहिलेले नाही..”
वास्तवाचे हे विदारक चित्र आहे…