Tuesday, September 17, 2024
Homeन्यूज अँड व्ह्यूजआज गुरूपौर्णिमा!

आज गुरूपौर्णिमा!

आज गुरूपौर्णिमा!

‘गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्‍वरः।

गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः॥

अर्थ: गुरु हेच ब्रह्मा, गुरु हेच सर्वव्यापक भगवान विष्णु आणि गुरु हे शंकर आहेत. एवढेच नव्हे तर ते साक्षात् परब्रह्म आहेत. अशा गुरूंना मी नमस्कार करतो.

हिंदु शास्त्रामध्ये वरील श्‍लोक सांगितला आहे. गुरूंशिवाय तरणोपाय नाही. ईश्वराचे सगुण रूप म्हणजे गुरु आणि गुरूंचे निर्गुण रूप म्हणजे ईश्वर अशी अनेक वैशिष्ट्ये गुरूंबद्दल सांगता येतील. मायेच्या भवसागरातून शिष्याला आणि भक्ताला अलगदपणे बाहेर काढणारे, त्याच्याकडून आवश्यक ती साधना करवून घेणारे आणि कठीण समयी त्याला अत्यंत जवळिकीने अन् निरपेक्ष प्रेमाने आधार देऊन संकटमुक्त करणारे गुरुच असतात. अशा परमपूजनीय गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी गुरुतत्त्व नेहमीच्या तुलनेत 1 सहस्त्र (हजार) पटींनी कार्यरत असते. यावर्षी आषाढ पौर्णिमा अर्थात व्यासपूजन म्हणजेच गुरुपौर्णिमा आज, 21 जुलैला आहे. सनातन संस्थेद्वारा संकलित या लेखात आपण गुरुपौर्णिमेचे महत्त्व, गुरुपौर्णिमा साजरा करण्याची पद्धत तसेच गुरु-शिष्य परंपरा याविषयी जाणून घेणार आहोत.

गुरूपौर्णिमा

1. तिथी- गुरुपौर्णिमा हा उत्सव सर्वत्र आषाढ पौर्णिमा या दिवशी साजरा केला जातो.

2. उद्देश- गुरु म्हणजे ईश्वराचे सगुण रूप! वर्षभर प्रत्येक गुरु आपल्या भक्तांना अध्यात्माचे बोधामृत भरभरून देत असतात. त्या गुरूंच्या प्रती अनन्य भावाने कृतज्ञता व्यक्त करणे, हा गुरुपौर्णिमा साजरा करण्यामागील उद्देश आहे.

3. महत्त्व- गुरुपौर्णिमा या शुभदिनी दिवशी गुरुतत्त्व (ईश्वरी तत्त्व) नेहमीच्या तुलनेत 1 सहस्र (हजार) पटीने कार्यरत असते. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने केलेली सेवा आणि त्याग (सत्साठी अर्पण) यांचा इतर दिवसांच्या तुलनेत 1 सहस्र पटीने लाभ होतो; म्हणून गुरुपौर्णिमा ही गुरुकृपेची (ईश्वरकृपेची) एक अनमोल पर्वणीच आहे.

4. गुरुपौर्णिमा साजरा करण्याची पद्धत- प्रत्येक गुरूंचे शिष्य या दिवशी त्यांच्या गुरूंची पाद्यपूजा करतात आणि त्यांना गुरुदक्षिणा मनोभावे अर्पण करतात. या दिवशी व्यासपूजा करण्याची प्रथा आहे. गुरुपरंपरेत महर्षि व्यास यांना सर्वश्रेष्ठ गुरु मानले आहे. सर्व ज्ञानाचा उगम महर्षि व्यास यांच्यापासून होतो, अशी भारतियांची धारणा आहे. कुंभकोणम् आणि शृंगेरी ही शंकराचार्यांची दक्षिण भारतातील प्रसिद्ध पिठे आहेत. या ठिकाणी व्यासपूजेचा महोत्सव साजरा होतो. व्यासमहर्षी हे शंकराचार्यांच्या रूपाने पुन्हा अवतीर्ण झाले, अशी भाविकांची श्रद्धा आहे; म्हणून संन्यासी लोक या दिवशी व्यासपूजा म्हणून शंकराचार्यांची पूजा करतात.

5. गुरुपूजनाचा विधी- स्नानादी नित्यकर्मे आटोपून ‘गुरुपरम्परासिद्ध्यर्थं व्यासपूजां करिष्ये।’ असा संकल्प करतात. एक धूतवस्त्र अंथरून त्यावर गंधाने पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे अशा बारा रेघा काढतात. ते म्हणजे महर्षि व्यास यांचे व्यासपीठ होय. मग ब्रह्मा, परात्परशक्ती, व्यास, शुकदेव, गौडपाद, गोविंदस्वामी आणि शंकराचार्य यांचे त्या व्यासपिठावर आवाहन करून त्यांची षोडशोपचारे पूजा करतात. याच दिवशी दीक्षागुरु आणि मातापिता यांचीही पूजा करण्याची प्रथा आहे.

गुरूपौर्णिमा

6. गुरु-शिष्य परंपरा- एकदा एका विदेशी व्यक्तीने स्वामी विवेकानंद यांना प्रश्‍न विचारला, ‘‘भारताचे एका वाक्यात वर्णन करायचे झाल्यास कसे कराल?’’ तेव्हा स्वामी विवेकानंद यांनी सांगितले, ‘‘गुरु-शिष्य परंपरा!’’ ‘गुरु-शिष्य परंपरा’ ही हिंदूंची लक्षावधी वर्षांची चैतन्यमय संस्कृती आहे. परंतु काळाच्या प्रवाहात रज-तमप्रधान संस्कृतीच्या प्रभावामुळे या महान अशा गुरु-शिष्य परंपरेची उपेक्षा होत आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुपूजन होते तसेच गुरु-शिष्य परंपरेची महती समाजाला सांगता येते. थोडक्यात गुरुपौर्णिमा म्हणजे गुरु-शिष्य परंपरेचे जतन करण्याची सुसंधीच होय!

गुरु-शिष्य अशा सुरेख संगमातून महान राष्ट्राच्या निर्मितीची अनेक उदाहरणे पुराणकाळापासून इतिहासापर्यंत पाहायला मिळतात. उदा. श्रीराम आणि वसिष्ठ, पांडव आणि श्रीकृष्ण. चंद्रगुप्त मौर्य याला आर्य चाणक्य यांनी गुरु म्हणून मार्गदर्शन केले आणि एका बलशाली राष्ट्राची उभारणी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्थ रामदासस्वामी आणि संत तुकाराम महाराज यांनी मार्गदर्शन केले अन् छत्रपती शिवाजी महाराज यांनी 5 पातशाह्यांना पराभूत करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हे आपले आदर्श आहेत. आज गुरु-शिष्य परंपरेला पुनरुज्जीवित करण्याची वेळ आली आहे. गुरु-शिष्य परंपरा पुनरुज्जीवित करण्यासाठी भारत पुनःश्‍च हिंदु राष्ट्र बनणे आवश्यक आहे.

संदर्भ: सनातन संस्थेचा ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’ आणि ‘गुरुकृपायोग’

संपर्क: 9920015949

Continue reading

बुधवारी खुली राहणार भायखळ्यातली ‘राणीची बाग’!

मुंबईतल्या भायखळा (पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय (म्हणजेच पूर्वीची राणीची बाग) येत्या बुधवारी, १८ सप्टेंबरला जनतेकरिता खुले राहणार आहे. त्याऐवजी हे उद्यान दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवार, १९ सप्टेंबर रोजी बंद ठेवण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाकडून प्रसिद्ध...

यापुढे ‘बाबू’ ठरवणार, सणवार कधी साजरे करायचे ते?

यापुढे मुहूर्त, रितीरिवाज, चालीरीती, परंपरा अशा सर्व बाबींना तिलांजली दिली जाणार आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या मनात येईल त्याप्रमाणे या महाराष्ट्रातील जनता सण, उत्सव साजरे करेल असे एकूण चित्र दिसते. आज होणारी ईद असो किंवा गणेशोत्सव, सरकारी बाबू म्हणतील त्याप्रमाणे हे...

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कोलांटउडी! 

दारू घोटाळ्यात अडकलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या अटींवर कोणतेही भाष्य न करता जनतेचा कौल मागण्यासाठी आपण मुख्यमंत्रीपद सोडत असल्याचा आव आणत त्यांनी जनतेच्या भावनेला हात घालण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जाते. नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी...
error: Content is protected !!
Skip to content