Homeडेली पल्सप्रत्येक गचक्यात सरकारचा...

प्रत्येक गचक्यात सरकारचा नाकर्तेपणा आठवतो!

नाशिक-मुंबई रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांतून जात असताना सामान्य माणसांना जो गचका बसतो तो प्रत्येक गचका ट्रिपल इंजिन सरकारच्या नाकर्तेपणाची आठवण करून देतो. भरमसाठ टोल आकारायचे, मात्र रस्त्यांची साधी डागडुजीसुद्धा करायची नाही. वाहतूककोंडीवर मार्ग काढायला सरकार तयार नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.

विद्यमान ट्रिपल इंजिन सरकारने महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत दयनीय करून टाकली आहे. राज्यातल्या सर्वच प्रमुख रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे. गाडी चालवणे आणि प्रवास करणे जीवावर बेतणारे आहे. रस्त्यावरचा प्रत्येक खड्डा महायुती सरकारच्या नाकर्तेपणाची साक्ष देतो. रस्त्यावर असणारे खड्डे आणि त्यावर जर मार्गच काढायचा नसेल तर टोल कशाचा घेता, असा सवालही त्यांनी केला.

नाशिक येथे उत्तर महाराष्ट्र विभागीय आढावा बैठकीच्या निमित्ताने थोरात नाशिकमध्ये होते. यावेळी थोरात म्हणाले की, नाशिक मुंबई महामार्गाची परिस्थिती वाईट आहे. अडीच तासांच्या प्रवासाला चार ते साडेचार तास लागतात. एकेका जागेवर तासभर प्रतीक्षा करावी लागते. भिवंडीमध्ये तर रस्ता कोणता आणि खड्डे कोणते हे शोधणे मुश्किल झालेले आहे. भिवंडीतली वाहतूककोंडी जीवघेणी ठरत आहे. या महामार्गावर झालेल्या खड्ड्यांबद्दल कोणीही चकार शब्द बोलायला तयार नाही. टोलची वसुली मात्र बिनबोभाट सुरू आहे. हीच परिस्थिती राज्यातल्या सगळ्यात महामार्गांची झालेली आहे. त्यामुळे जनमानसात असंतोष वाढत आहे.

विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान नाशिक-मुंबई महामार्गावरील वाहतूककोंडी आणि खड्डे यांच्यावर काँग्रेसने आवाज उठवला. मंत्रीमहोदयांनी तातडीने त्यावर कारवाई करतो असे आश्वासनही दिले. मात्र वाहतूककोंडीत सुधारणा होण्याऐवजी वाढ झालेली आहे, असेही ते म्हणाले.

टोलच्या संदर्भाने राज ठाकरेंनी काय भूमिका घ्यावी, हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र जनतेमध्ये प्रचंड उद्रेक आहे आणि काँग्रेस जनतेच्या या उद्रेकासोबत आहे. रस्त्यावरच्या खड्ड्यांबाबतीत काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही वारंवार हा प्रश्न लावून धरला, विधानसभेत मांडला. सरकारकडून पर्याय मिळत नसल्याने जनतेच्या मनात भरमसाठ टोल आणि भरमसाठ खड्डे यामुळे प्रचंड संताप आहे, असेही थोरात म्हणाले.

Continue reading

शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सुनिता कामटे सेवानिवृत्त

मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील सुविद्या प्रसारक संघाच्या श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालय आणि योजना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनिता कामटे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे...

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा पुरंदरे यांचे देहावसान

मुंबईतल्या दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या सल्लागार सदस्या तसेच दादर वनिता समाज, या प्रतिष्ठित संस्थेच्या ज्येष्ठ सदस्या सुरेखा पुरंदरे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शास्त्रीय संगीतात...

प्राध्यापक डॉक्टर भ्रष्टाचारी? जे. जे. रुग्णालयात खळबळ!

मुंबईतील प्रसिद्ध जे. जे. रुग्णालयाच्या अस्थिरोगशास्त्र (आर्थॉपेडिक्स) विभागात एका वरिष्ठ प्राध्यापकाविरुद्ध अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आरोप झाल्यामुळे वैद्यकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. प्रा. डॉ. नितीन महाजन यांच्यावर निवासी डॉक्टरांचा मानसिक व आर्थिक छळ करणे, बनावट सह्या करणे आणि...
Skip to content