Wednesday, October 16, 2024
Homeन्यूज अँड व्ह्यूजबाटलीबंद पाणी पिताय?...

बाटलीबंद पाणी पिताय? सावधान!

जगाच्या एकूण ७९५ कोटींच्या लोकसंख्येतील २०० कोटी लोक बाटलीबंद पाणी पितात असा आताचा अंदाज आहे. यापैकी काहींना पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नसल्याने त्यांच्यावर ही पाळी येते तर इतरांना बाटलीतले पाणी पिणे हे सधन असल्याचे लक्षण म्हणून आणि त्याशिवाय एक ‘सोय-शास्त्र’ म्हणून बाटलीचे पाणी पिणे पसंत असते. आणखी एका प्रकारचे लोक बाटलीचे पाणी हे साध्या नळाच्या पाण्यापेक्षा अधिक शुद्ध असते या केवळ उत्तम ‘मार्केटिंग’च्या आहारी जाऊन बाटलीच्या पाण्याच्या अधीन झालेले आढळतात.

बाटलीच्या पाण्याचा माणसावर आणि पर्यावरणावर घातक परिणाम होऊ शकतो आणि त्याबद्दल काहीतरी ठोस पावले उचलायला हवी, असे विज्ञानाचे मत आहे आणि ते ब्रिटिश मेडिकल जर्नलच्या ‘जागतिक आरोग्य’ या अंकात मांडले गेले आहे. जागतिक पातळीवर दर मिनिटाला १० लाख पाण्याच्या बाटल्या खरेदी केल्या जातात आणि मागणी वाढत असल्यामुळे यामध्ये वाढ होणे अपेक्षित आहेच. बाटलीबंद पाण्यामुळे केवळ आरोग्यालाच धोका पोहोचतो असे नसून त्यामुळे दर मिनिटाला प्लास्टिकचा कचरा किती निर्माण होत असेल याचा विचार केला जायला हवा.

विज्ञानाच्या मते नळाच्या सहाय्याने पाणीपुरवठा केव्हाही चांगला आणि शाश्वत असेल. कतारमधील विल कॉर्नेल संस्थेचे संशोधक म्हणतात की बाटलीचे पाणी नळाच्या पाण्यापेक्षा चांगले असते असे सांगता येणार नाही. याचे मुख्य कारण असे असते की वेष्टनावर छापलेल्या शुद्धतेच्या सर्व गरजांचे उत्पादनाच्या वेळी पालन केले जाईलच असेही सांगता येणार नाही. याशिवाय प्लास्टिकच्या बाटल्या तयार करतानाची काही रसायने बाटलीला चिकटली असतील तर ती निरुपद्रवी आहेत असे म्हणता येणार नाही. त्यातच हे बाटलीबंद पाणी अगदी उन्हातान्हात किंवा कोणत्याही परिस्थितीत किती दिवस साठवले गेले आहे याची प्रत्येकवेळी माहिती दिली जाते असेही नाही. प्लास्टिकचे सूक्ष्म कण माणसाच्या शरीरातच नव्हे तर थेट मेंदूत आढळून आले आहेत.

या पाण्याचे नमुने तपासले असता बाटलीबंद पाण्याच्या १० ते ७८ टक्के नमुन्यांमध्ये प्लास्टिकला अधिक टिकाऊ करण्यासाठी रसायने वापरली जातात. अशा रसायनांमुळे भारतातच आतड्याच्या कर्करोगाने एकाचा मृत्यू झाला आणि या कारणाचे निदान फार उशिरा होऊ शकले. यातला धोका ओळखावा लागेल. पाण्याच्या बाटलीमधील सूक्ष्म प्लास्टिकचा हा भयानक संसर्ग ताणतणावाला, रोगप्रतिकारक यंत्रणेच्या अपयशाला आणि रक्तातील काही घटकांमधील बदलाला कारण ठरतो. यातूनच मग उच्च रक्तदाब, मधुमेह आणि लट्ठपणा निर्माण होतो. यावरील स्वल्प-कालीन सुरक्षाउपाय असले तरी याचे दीर्घकालीन परिणाम काय असतात यावर पुढील संशोधन सुरु आहे.

सूक्ष्म प्लास्टिक आता आहारात शिरायलाही सुरुवात झाली आहे. प्लास्टिक बाटल्या सागराचे प्रदूषण करण्यात दोन नंबरवर आहेत तर एकूण टाकाऊ प्लास्टिकमध्ये त्या १२ टक्के असतात. या १२ टक्क्यांपैकी केवळ ९ टक्के पुनर्चक्रान्कित केल्या जातात. याचा आणखी एक अर्थ असा होतो की, त्या एकतर कचरा वाढवतात, जाळल्या जातात अथवा सामाजिक न्यायाच्या नावाखाली गरीब देशांमध्ये निर्यात केल्या जातात.

बाटलीबंद पाणी हा विषय सोपा म्हाणून सोडून देण्याचा नसून त्यावर योग्य तो निर्णय घेणे गरजेचे आहे. यामध्ये एकदा वापरून फेकून दिल्या जाणाऱ्या बाटल्यांचे प्रमाण अधिक आहे आणि त्यावर सामाजिक विचारातूनच नियंत्रण आणणे शक्य आहे. यासाठी समजशिक्षण आवश्यक आहेच, परंतु शालेय पातळीवर यासाठी प्रयत्न केले तर त्याचा दूरगामी आणि शाश्वत परिणामही होऊ शकेल. पिण्याच्या पाण्यासाठी नळाच्या पाण्याला प्राथमिकता दिली गेली तर आपण यावर विविध पैलू असलेले काही उपाय शोधून काढू शकू. प्लास्टिक आणि प्लास्टिक बाटल्या ही माणसाचीच निर्मिती आहे. त्यामुळे या जीवघेण्या प्रकारावर त्याच्याकडूनच नियंत्रण आणता येईल. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

एक चित्र हजार शब्दांचे… 

एक चित्र जे सांगू शकेल ते हजार शब्दही व्यवस्थित सांगू शकणार नाहीत, अशी एक चिनी म्हण आहे आणि ती अनेकदा आपल्या प्रत्ययालासुद्धा येत असते. जे ऐकले त्याचा जेवढा परिणाम होत नाही तितका परिणाम तेच पाहिले तर अधिक होतो हेही...

निवृत्तीकाळ दिव्यांग खेळाडूंचा..

आपण दिव्यांग असावे असे कुणालाही वाटणार नाही आणि ज्यांचा जन्मच दिव्यांग म्हणून झाला आहे त्यांना समज येईपर्यंत त्यांच्या पालकांची अवस्था काय होत असेल याची आपण कल्पनाच करू शकत नाही. त्यांच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण आपल्या कुटुंबातील दिव्यांगाला समाजात योग्य स्थान...

पॉमेल घोड्यावर स्वारी!

ऑलिम्पिक म्हणजे विविध खेळांमध्ये जागतिक प्राविण्याची चढाओढ असते. यातले बरेच खेळ आणि त्यांच्या स्पर्धा आपण बघितल्या आहेतच. परंतु सामान्य ऑलिम्पिकमध्ये खेळल्या जाणाऱ्या खेळांपेक्षा दिव्यांग ऑलिम्पिकमध्ये कसरतपटूंची कामगिरी अधिक कठीण असते, कारण आपल्या शरीरातील उणीव आपल्या दुर्दम्य असा आशावाद आणि...
Skip to content