Homeमुंबई स्पेशलकुर्ला, पवई आणि...

कुर्ला, पवई आणि बोरीवलीत होणार घनदाट वृक्षराजी

मुंबई महानगरातील पर्यावरण संतुलन टिकवून ठेवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड मोहीम हाती घेतली आहे. मुंबईतील कुर्ला, पवई आणि बोरीवली ही तीन ठिकाणे मिळून तब्बल चार एकर क्षेत्रफळावर साडेतीन हजार वृक्षांची पारंपरिक पद्धतीने लागवड करण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी आज दिली. 

मुंबई महानगरातील झाडांची निगा कशी राखावी, त्यांचे संगोपन कसे करावे, वृक्षलागवड क्षेत्रात कोणकोणते अभिनव उपक्रम राबविण्यात येतील, झाडांची पडझड कशी रोखावी आदी विषयांवर उहापोह करण्यासाठी पालिकेचे आधिकारी आणि पर्यावरण क्षेत्रातील विविध संस्थांचे पदाधिकारी, पर्यावरणतज्ज्ञ आदींची पालिका मुख्यालयात आज बैठक झाली. या बैठकीत मार्गदर्शन करताना आयुक्त गगराणी बोलत

होते. अतिरिक्त आयुक्त डॉ. अमित सैनी, सहआयुक्त चंद्रशेखर चोरे, उपायुक्त किशोर गांधी, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी आदींसह ‘प्रोजेक्ट मुंबई’चे शिशिर जोशी, पार्ले वृक्ष मित्र संघटनेचे अनिकेत करंदीकर, फ्रेंड्स ऑफ ट्रीजचे डॉ. अशोक कोठारी, तुषार देसाई, अदिती काणे, उद्यानविज्ञातज्ज्ञ रॉबर्ट फर्नांडिस, अनिल राजभर, ‘हरियाली’चे आठल्ये, ‘वातावरण फाउंडेशन’चे भगवान केशभट, ‘मिशन ग्रीन मुंबई’चे सुभाजित मुखर्जी, ‘मियाम ट्रस्ट’चे नितू जोशी, ‘नेचर फॉरेवर’चे मोहम्मद दिलावर, ‘मेगा फाउंडेशन’च्या अनुषा अय्यर आदींसह विविध पर्यावरणविषयी संस्थांचे पदाधिकारी, पर्यावरणतज्ज्ञ या बैठकीला उपस्थित होते.

मुंबईत अनेक ठिकाणी पुरातन वृक्ष आहेत. त्यांचे संगोपन करण्यासाठी पालिका विविध उपक्रम राबवित आहे. धोकादायक ठरणाऱ्या झाडांच्या फांद्यांची शास्त्रोक्त पद्धतीने छाटणीही वेळच्यावेळी करण्यात येते. यासह अधिकाधिक ठिकाणी वृक्षांची लागवड कशी वाढविता येईल, यासाठीदेखील पालिका प्रयत्नशील

आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईत तीन मोठ्या भूखंडांवर वृक्षलागवड करण्यात येणार आहे. यासाठी कुर्ल्यातील चांदिवली, तसेच पवई आणि बोरिवली या तीन ठिकाणी मोठे भूखंड वृक्ष लागवडीसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. हे तीन ठिकाणे मिळून चार एकर भूखंडावर साडेतीन हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. या झाडांची निवड कशी करावी, त्यासाठी कोणती शास्त्रोक्त पद्धत वापरावी, त्यांचे आयुर्मान वाढवावे यासाठी कोणती काळजी घ्यावी, याबाबत पालिका आराखडा तयार करीत आहे. यासाठी पर्यावरणतज्ज्ञांनी मत नोंदवावे. पालिका कार्यक्षेत्रात आणखी २९ ठिकाणी वृक्षलागवड करण्यात येणार असल्याचेही गगराणी यांनी नमूद केले. 

पर्यावरण अभ्यासकांनी विविध विषयांवर बैठकीत मते मांडली. मुंबईतील झाडांचे आयुर्मान कसे वाढवावे, झाडांची छाटणी करताना घ्यावययाची काळजी, पुरातन झाडांचे जतन कसे करावे, दुभाजकांमध्ये कोणती झाडे लावावीत आणि ती लावताना कोणती काळजी घ्यावी, झाड दत्तक घ्यावे, ‘एक डॉक्टर – एक झाड दत्तक’ उपक्रम राबवावा, पालिकेच्या उद्यानांमध्ये पक्ष्यांसाठी बारमाही पाण्याची सोय करावी, उड्डाणपुलांखाली जागेचा वापर वृक्षलागवडीसाठी करावा, नागरी वने (मियावाकी) वाढवावीत, शाळांमध्ये जनजागृती करावी, एनसीसीच्या विद्यार्थ्यांचा वृक्षरोपणात सहभाग वाढवावा आदी विविध पर्याय यावेळी सुचविण्यात आले. या पर्यायांचा विचार करून पालिका वृक्षलागवडीसाठी त्याचा उपयोग करणार, असे उद्यान उपायुक्त किशोर गांधी यांनी प्रशासनाच्या वतीने आश्वस्त केले.

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content