राग येणे हा माणसाचा जन्मसिद्ध अधिकार असतो हे मान्य करावे लागेल. कारण प्रत्येक माणसाला कधी ना कधी तरी राग येतोच. महान असो की लहान, यापैकी प्रत्येकाला राग येत असतो. त्यातून काय फायदेतोटे आहेत किंवा असू शकतात हे आपण बघणार आहोतच आणि ते आपल्या पूर्वजांनीही सांगून ठेवले आहे. राग आला तरी जेवणावर राग काढू नये इथपासून तो ‘अति राग, भीक माग.. त्याहून राग, देश त्याग..’ हेही आपण ऐकलेच असणार. रागाने तापून डॉक्टरांकडे जावे लागले असताना ‘तुम्हाला रागाचा झटका आला आहे’ असे त्यांनी सांगण्याची गरज पडू नये इतकी काळजी तरी नक्की घ्या. तुम्हाला जो त्रास होतो आहे तो राग आल्यामुळे नव्हे तर तो तुम्ही दाबून ठेवला आहे म्हणून असे मनाशी पक्के करून घ्या. त्यातून तुम्हाला काही आराम मिळेल. काही प्रमाणात तुम्ही शांत होऊ शकाल.

आपल्यापैकी अनेकांचा असा समज असतो की, आपल्या रागीट स्वभावाची चुणूक इतरांना दाखवली की आपल्या या रहस्यमय शक्तीमुळे आपल्याशी कुणी ‘भिडू’ शकणार नाही. पण वास्तविक बघता असे नसते. आपल्याला राग यायलाच हवा आणि तो आपण बोलूनही दाखवू शकलो पाहिजे, असा या लोकांचा आणखी एक समज असतो आणि तो नेहमी चूकच ठरतो. स्वत:ला स्पष्टवक्ता समजणाऱ्या बहुतेकांचा हा भ्रम दिसतोही. राग कोणत्याही कारणाने येऊ शकतो आणि त्यातले कारण नेहमीच चुकीचे असते असेही नाही. परंतु आजच्या जगात तरी या रागावर नियंत्रण ठेवायला शिकावेच लागणार आहे आणि हे नियंत्रण म्हणजे राग दाबून ठेवणे कधीही असू शकत नाही. एखाद्याजवळच्या माणसाची काळजी आणि आवश्यक सेवा करीत असताना घरातील इतरांच्या बाबतीत आपण आवश्यक काळजी घेऊ शकत नाही, दुर्लक्ष होते असा अनुभव येतो. आणि त्यातूनही रागाला वाचा फुटू शकते. या परिस्थितीतही राग दाबून ठेवणे इष्ट नसते. त्यावर उपाय शोधलेच पाहिजेत.
अलिकडच्या काळातील एका संशोधनात असे दिसून आले आहे की, राग दाबून ठेवण्याची सवय प्रामुख्याने महिलांना असते आणि भारतात अजूनही महिला हे करीत आहेत. याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर होतो. परंतु दाबून ठेवलेला राग दिसू न देण्याचा त्यांचा स्वभाव बनत जातो. महिला आतल्याआत स्वत:ला ‘चूप’ करीत असतात. जेव्हा याचा स्फोट होऊन डॉक्टरांचा दवाखाना जवळ करावा लागतो त्यावेळी ते काय म्हणतात हे आपण अगोदर पाहिलेच. पश्चिमी देशातील जनतेमध्ये विशेषत: कृष्णवर्णीय आणि त्यातही महिला आपला राग अधिक दाबून ठेवतात असे दिसले आहे. आपल्याकडे महिलांच्या बाबतीत ही स्थिती बघायला मिळतेच. यामधून पोटाचे आणि प्रसंगी मेंदूचे विकारही संभवतात असे २०२२मधील एका संशोधनात दिसले.

महिलांच्या बाबतीत असे राग दाबून ठेवण्याचे प्रकार वारंवार घडतात तेव्हा त्या आपल्या कुटुंबाची हवी तशी काळजी घेऊ शकत नाहीत हे ओघाने आलेच. सुरुवातीला त्यांना त्याचे परिणाम जाणवत नाहीत. परंतु कालांतराने आणि वय वाढते तेव्हा स्थिती कदाचित् हाताबाहेर गेलेली असू शकते. सुरुवातीच्या काळात महिलांना आणि पुरुषांनाही असे वाटते की राग येणे आणि तो दाबून ठेवणे ही त्यांची एक खास शक्ती आहे. कधीकाळी त्याचा उपयोग होत असेलही. परंतु स्वत:च्या प्रकृतीच्या दृष्टीने असे करणे चुकीचे ठरेल. आजकाल या विषयावर तज्ज्ञांनी लिहिलेले काही लेख उपलब्ध होऊ शकतात. त्याशिवाय आपल्या घरच्यांशी याबाबतीत संवाद साधला तरी असा प्रकार कमी होऊ शकतो. याचे कारण असे की, आपण आपला राग दाबून ठेवत आहोत याचीच आपल्याला अनेकदा कल्पना नसते… बघा विचार करून…तुम्हालाही हे नक्की पटेल!