Friday, September 20, 2024
Homeमाय व्हॉईसमुख्यमंत्र्यांनो, निसर्गावर खापर...

मुख्यमंत्र्यांनो, निसर्गावर खापर किती दिवस फोडणार?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रायगड जिल्ह्यातील दरडग्रस्त तुळीये गावाला भेट दिली. तेथील नुकसानीची पाहणी केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.. ते म्हणाले,”ढगफुटी केव्हा होईल, किती होईल याचा अंदाज करता येत नाही.” हे विधान हवामान खात्यावर अविश्वास व्यक्त करणारे आहे. हवामान खाते केंद्राच्या अखत्यारित असल्याने त्यावर त्यांचा विश्‍वास नसावा.. पण हरकत नाही. मुख्यमंत्र्यांनो, तुमचा हवामान खात्यावर भरोसा नसेल, पण किमान मागील आकडेवारीवरून तरी बोध घ्यायला हरकत नाही..

रायगडमध्ये सरासरी २९३४ मिली मिटर पाऊस पडतो. त्यापेक्षा जास्त पाऊस झाला तर ढगफुटी झाली म्हणता येऊ शकते, जशी २००५मध्ये झाली होती.. तेव्हा ३९१३ मिली मिटर पाऊस झाला होता.. एकाच दिवशी किती पाऊस होऊ शकतो याचीही आकडेवारी उपलब्ध आहे.. ती गृहित धरून नियोजन होणं अपेक्षित असतं. ते होत नाही..

मुख्यमंत्र्यांनी आणखी एक घोषणा केली. “ज्या वस्त्या धोकादायक आहेत त्या वस्त्यांचं ताबडतोब पुनर्वसन करण्यात येईल”. ही घोषणा पुढील किमान २५ वर्षे तरी प्रत्यक्षात येऊ शकत नाही. याचं कारण जिल्हयात दरडीचा धोका असलेली ८४ गावं आहेत. त्यातील किमान 50 गावं, वस्त्या अशा आहेत की त्यांचं तातडीनं पुनर्वसन व्हायला हवं.. २००५च्या महापुरानंतर सरकारला जिल्हा प्रशासनाने तसं सांगितलंदेखील होतं. ते झालंच नाही.

२००५नंतर म्हणजे गेल्या १५-१६ वर्षांत एकाही वस्तीचं पुनर्वसन होऊ शकलं नाही.. इथं केवळ दरडी हाच विषय नाही. जिल्ह्यात ४८० अशी गावं आहेत की, ती विविध कारणांनी असुरक्षित आहेत.. जिल्हयात २० लहानमोठ्या नद्या आहेत.. या नद्यांच्या काठावर २६१ गावं आहेत. समुद्रलगत ५३ गावं आहेत. खाडीलगत ७२ गावं आहेत. पाऊस आणि पूर आला की, ज्या गावांचा हमखास संपर्क तुटतो अशी ४६ गावं आहेत. ही सारी गावं सुरक्षित नाहीत.

मुख्यमंत्र्यांनो

महाड, नागोठणे, जांभुळपाडा ही सतत मार झेलणारी गावंही यात आहेत. या ४८० गावांपैकी किमान २०० गावं अशी आहेत की, त्याचं पुनर्वसन होणं गरजेचं आहे. ते शक्य नाही. अशी आपत्ती घडली की, अशा घोषणा कराव्या लागतात. २००५मध्ये महापुराच्या वेळेस तत्कालिन मुख्यमंत्र्यांनी हेच सांगितलं होतं. पण अजून दासगावचंदेखील धड पुनर्वसन सरकारला करता आलेलं नाही. काही गावाचं पुनर्वसन स्वयंसेवी संस्थांनी केलं म्हणून ते झालं. सरकारला ते जमलं नाही.

या ४८० धोकादायक गावातून जवळपास साडेसहा लाख लोक म्हणजे जिल्हयातील एक चतुर्थांश जनता राहते, हे आपण विसरता कामा नये. या सर्वांना सुरक्षिततेचा भरोसा देणं म्हणजे नुसती दिशाभूल आहे.. ते होऊ शकत.. त्यामुळं मृतांच्या नातेवाईकांना मदत देऊन आणि जखमींवर उपचार करून हा विषय पुढील दुर्घटना घडेपर्यंत संपवावा हेच राजकीयदृष्ट्या सोयीचे आहे.. मुख्यमंत्र्यांचा हेतू प़ामाणिक असला तरी होणार काहीच नाही हे नक्की..

ज्या गोष्टी शक्य नाहीत त्यावर भाष्य करण्यापेक्षा आपल्या हातात जे आहे ते करणं अधिक शहाणपणाचं ठरेल.. पण हा शहाणपणा राजकीयदृष्ट्या अडचणीचा ठरू शकतो, म्हणून निसर्गावर खापर फोडून मोकळे होण्याची सोपी पळवाट राजकारणी निवडत असतात.. यावेळी तेच होतंय.. सरकारला खरंच काही करायचं असेल आणि सततच्या आपत्तीतून कोकणाला वाचवायचं असेल तर काही अप्रिय निर्णय सरकारला घ्यावेच लागतील..

रायगडमध्ये ३००० मिली मिटर पाऊस तर दरवर्षी पडत असतो.. पण १९८९च्या अगोदर अशा मोठ्या दुर्घटना घडल्याचे दिसत नाही. म्हणजे गेल्या ३० वर्षांत काही तरी बिघडलंय.. नेमकं काय बिघडलंय? त्याचा अभ्यास करावा लागेल.. १९८९मध्ये केवळ पूर आले होते. दरडी कोसळल्या नव्हत्या.. त्या २००५मध्ये कोसळल्या.. असं का घडलं? कारण उघड आहे.. कोकणात मोठ्या प्रमाणांत वृक्षतोड झाली. डोंगर बोडखे आणि कोकण उजाड झाला..

मुख्यमंत्र्यांनो

झाडं तुटल्याने मातीला घट्ट पकडून ठेवणारी नैसर्गिक व्यवस्था संपुष्टात आली. वरती डोंगर चोहोबाजुंनी पोखरले गेले. सुरूंगस्फोटांनी सारे डोंगर खिळखिळे करून टाकले. त्यामुळे डोंगरांना भेगा पडणे आणि डोंगर कोसळणे सुरू झाले. म्हणजे वृक्षतोड आणि डोंगरांचे लचके तोडणे थांबवावे लागेल. ते होणार नाही. कारण हे सारे पाप उद्योग, राजकारणी आणि त्यांच्या संगनमताने धनदांडग्यांच्या हातात आहेत आणि ते कोणताही मुख्यमंत्री थांबवू शकत नाही.. हे वास्तव आहे..

आणखी एक.. नद्या, खाडया, समुद्राच्या काठावर मोठ्या प्रमाणात भराव टाकून पाणी निचर्‍याचे परंपरागत मार्ग बंद केले गेले आहेत. त्याचबरोबर कोकणातील खोलगट नद्यांमध्ये गाळ साचल्याने त्या उथळ झाल्या आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरून जात असताना सावित्री नदीत निर्माण झालेली बेटं आपल्या नजरेस पडतात. यामुळे समुद्राला भरती असली आणि पूर आलेला असला की, पाणी सरळ नदी पात्राबाहेर पडून रस्ता मिळेल तिकडे जाते आणि मोठा हाहाःकार उडतो.

२००५ला हेच दिसलं आणि आजही तेच दिसतंय.. हे भराव घालणे, बेकायदेशीर बांधकामं, नदी, खाडी काठावरील अतिक्रमणं थांबली नाही तर परिस्थिती आणखीच गंभीर होत जाईल.. कारण १९८९ला जांभुळपाडा आणि नागोठण्याला फटका बसला.. २००५मध्ये जवळपास सारा रायगडच संकटात सापडला.. आजही आपत्तीची व्याप्ती आणि तीव्रता वाढतेय..

कोकणाला पूर नवे नसले तरी चिपळूणची पूर्णतः वाताहत करणारा अशा महापूर यापुर्वी कधी आला नव्हता.. तो यंदा आला.. का आला? कमी वेळात भरपूर पाऊस झाला म्हणून.. हे कारण आता कोणाच्याच पचनी पडत नाही.. कारण खोलात जाऊन शोधावं लागेल.. त्याची तयारी कोणाचीच नाही.. कारण तसं करणं राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या कोणालाच सोयीचं नाही.. त्यामुळे निसर्गाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं.. तसं करणं सोपं असतं.. सोयीचंही असतं..

२००५मध्ये हेच केलं गेलं.. आजही तेच चाललंय.. मात्र परिस्थितीचं गांभीर्य बघता, पोकळ सवंग घोषणा करून वेळ मारून नेण्याची किंवा निसर्गावर खापर फोडून जबाबदारीतून हात झटकण्याचा ही वेळ नाही.. राजकीय फायदया तोट्याचा विचार न करता कठोर भूमिका घेऊन काही निर्णय झाले तरच कोकणाची बर्बादी टाळता येऊ शकेल. अन्यथा कोकणचा विनाश अटळ आहे..

1 COMMENT

  1. एस एम,
    आपण खूप स्पष्ट अशी कानउघाडणी केली आहे.आपण म्हणता त्याप्रमाणे ८४ गावे, वाड्या यांचे पुनर्वसन ही खूप तातडीची गरज आहे.त्या दिशेने राज्य सरकारने स्थानिक प्रशासन मदतीला घेऊन ही प्रक्रिया सुरू केली पाहिजे…
    कोकणातील या सगळ्या प्रश्नांचे गांभीर्य आपण नेहमीच अधोरेखित केले आहे.
    – अरुण खोरे,पुणे

Comments are closed.

Continue reading

error: Content is protected !!
Skip to content