Homeन्यूज अँड व्ह्यूज.. म्हणे एसटीच्या...

.. म्हणे एसटीच्या आगारे एअरपोर्टच्या लाऊंजसारखी करणार!

महाराष्ट्राच्या परिवहन मंत्रिपदाची धुरा हाती आल्यापासून प्रताप सरनाईक यांनी एसटी सेवा सुधारण्याबात अनेक घोषणा करण्याचा सपाटा लावलेला आहे. त्यांच्या ‘विमान’सेवेचे प्रेम लक्षात घेता अनेक एसटी बसेसची आगारे आम्ही विमानतळासारखी चकाचक करू अशीही त्यांनी घोषणा केली आहे. त्यांच्याच शब्द वापरायचा झाल्यास एसटी डेपो ‘लाऊंज’सारखी करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यात चुकीचे काही आहे असे वाटतं नाही. परंतु एसटीची विविध ठिकाणी असलेली आगारे किंवा एसटीच्या कार्यशाळांची सध्याची परिस्थिती पाहता परिवहन मंत्र्यांच्या घोषणा व सद्यस्थिती यात जमीनअस्मानाचे अंतर आहे.

उदाहरणादाखल त्यांच्याच ठाणे शहरातील खोपट एसटी आगाराचे देता येईल. या एसटी आगाराच्या दरवाजातून आत जाण्यासाठी आटापिटा करावा लागतो. कारण, तेथे दिवसाचे चोवीस तास कुणाच्या ना कुणाच्यातरी खासगी मोटारगाडया पार्क केलेल्या असतातच. अधिकाऱ्यांच्या गाड्या कार्यालय आवारात सुलभरीतीने नेता याव्यात म्हूणन तेथे स्लोपही तयार केलेला आहे. ते

तर एक वेळ बाजूला ठेवू. या आगाराच्या पायऱ्यांवर नेहमीच कुणी भिकारी, कुणी गर्दुल्ला बसलेला दिसेलच. रात्री नऊ वाजल्यानंतर तर तेथे समाजकंटाकांचा अड्डाच असतो.. याच आगाराच्या मागील बाजूस नामदेव वाडीत एसटीची मोठी कार्यशाळाही आहे. तिची तर दुर्दशा पाहवत नाही. तेथे एसटीची एक ‘अश्वमेध’ गाडी चक्क दहा वर्षे ‘रुतून’ आहे. हे जणू सध्या एसटीचे प्रतीकच बनून राहिले आहे की काय असे वाटते!

‘गाळात रुतलेली’ एसटी.. कर्मचाऱ्यांच्या प्रसाधनगृहाचे तर दशावतार झाले आहेत. कामगारांना हातपाय धुवायलाही नीट जागा नाही तर नैसर्गिक विधींसाठीतरी योग्य जागा कशी मिळेल, असा प्रतिसवाल एका कामगारांने केला. उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि परिवहन मंत्री सरनाईक यांनी सरकारी लवाजमा न घेता खाजगी पाहणी दौरा करावा, असे आमचे आवाहन आहे. तशीच पाहणी ठाणे रेल्वेस्थानकाच्या परिसरात (प) असलेल्या एसटी आगाराचीही केली जावी. तेथील खंडहर बनलेल्या इमारतीकडे कुणाचेच लक्ष नाही. गरीब बिचाऱ्या प्रवाशांच्या डोक्यावरही कसलेच छपर नाही. हे आधी तयार करा आणि मग ‘लाऊंज’च्या गप्पा मारा!

छायाचित्र मांडणीः प्रवीण वराडकर

Continue reading

‘त्या’ बेवारस बोटीबाबत जाबजबान्या झाल्या तरी कुणाच्या?

आजकाल राज्यात वा केंद्रात जरा काही खुट्ट वाजले की उच्चस्तरीय चौकशी वा विशेष दक्षता पथकाकडून चौकशी केली जावी, अशी मागणी सर्वच राजकीय पक्षांकडून केली जाते. याच धर्तीवर सुमारे तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्याच्या समुद्रकिनारी सापडलेल्या बेवारस बोट व त्यातील...

देवाभाऊ गरिबांची कशाला चेष्टा करता?

आता डिसेंबर-जानेवारी महिन्यापर्यंत सत्ता व विरोधी पक्षांतील राजकीय नेते राज्यातील जनतेच्या तोंडावर कुठलेही आश्वासन फेकतील. कारण, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील व महापालिकांमधील निवडणुका होणार आहेत. अन्य कुठल्याही राजकीय नेत्यांनी आश्वासन दिल्यास त्याकडे दुर्लक्ष करता येते. परंतु मुख्यमंत्रीपदावरील हुशार व्यक्तीने (देवाभाऊ)...

आचार्य अत्रे यांनी जखम होऊ न देता केलेली गुळगुळीत दाढी!

आचार्य उपाख्य प्रल्हाद केशव अत्रे हे मराठी सारस्वताला मिळालेले मोठे देणे आहे. साहित्यिक, पत्रकार, राजकारणी नेता, शिक्षणतज्ज्ञ, अशा बहुविध भूमिका ते लीलया जगले, हे सारा महाराष्ट्र जाणतो. अशा या महान साहित्यकाराच्या लेखणीतून जन्मलेल्या 'झेंडूची फुले' या विडंबनात्मक काव्याला 100...
Skip to content